जामखेड (प्रतिनिधी: अमृत कारंडे)
जामखेड एसटी आगारातील बसेसच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना भेडसावत असलेल्या अडचणींना अखेर दिलासा मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) विभाग प्रमुख पांडुरंग माने यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, आगारासाठी मंजूर झालेल्या २० बसेसमधील उर्वरित १० नवीन बसेस लवकरच जामखेड आगारात दाखल होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेवर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पार्श्वभूमी
जामखेड आगारातील अनेक बसेस या जुन्या व मोडकळीस आल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. वारंवार होणारे बिघाड, रद्द होणाऱ्या फेऱ्या आणि वेळापत्रकातील विस्कळीतपणा यामुळे विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी तसेच ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले होते. या समस्येची गांभीर्याने दखल घेत पांडुरंग माने यांनी १२ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्याकडे २० नवीन बसेसची मागणी केली होती.
या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पहिल्या टप्प्यात १० बसेस जामखेड आगारात दाखल करण्यात आल्या होत्या. आता दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित १० बसेसही काही दिवसांत दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रवाशांना मोठा दिलासा
नवीन बसेस दाखल झाल्यानंतर जामखेड आगारातील बसेसची संख्या वाढणार असून, अनेक विस्कळीत मार्ग पुन्हा सुरळीत होण्यास मदत होईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला जाणे सोपे होणार आहे, तर नोकरदार वर्गालाही वेळेवर प्रवास करता येणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी सुरक्षित व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
माने यांची प्रतिक्रिया
या संदर्भात बोलताना पांडुरंग माने म्हणाले, “जामखेडकरांच्या प्रवासाच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले. राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्या सहकार्यामुळेच हा निर्णय शक्य झाला. यासाठी मी सर्व संबंधितांचे आभार मानतो. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी माझा लढा यापुढेही सुरू राहील.”
समाधानाची भावना
या निर्णयामुळे जामखेड तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून, नवीन बसेसच्या आगमनामुळे वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



