मेहकर प्रतिनिधी दशरथ गायकवाड
मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथे दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी देऊळगाव साखरशा ते बुद्ध विहार दरम्यान शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली.
बैठकीत माजी सरपंच पती बाळू वानखेडे यांनी प्रास्ताविक करताना बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त निघणारी मिरवणूक कोणत्याही वादाविना, शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडावी, असे आवाहन केले.
जानेफळ पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मिरवणुकीदरम्यान सुसंस्कृत वातावरण राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मिरवणुकीमध्ये बाबासाहेबांवरील सुमधुर गीते वाजवावीत आणि कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस तंटामुक्ती अध्यक्ष बी.एम. राठोड, बुलढाणा जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू देशमुख, पाटील गजानन पाचपोर, निसार पटेल, बाळू वानखेडे, पत्रकार दशरथ गायकवाड तसेच विविध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत सर्वांनी एकमताने बाबासाहेबांची जयंती शांततेत, एकोप्याने आणि उत्साहात साजरी करण्याचा निर्धार व्यक्त केला.



